रखरखत्या उन्हाळ्यानंतर चाहूल लागते ती पावसाची. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहात असतो आणि एके दिवशी आकाशात ढगांची गर्दी दाटू लागते, आभाळ भरून येते ,गार वारा सुटतो आणि पावसाचे थेंब बरसू लागतात. मातीचा सुगंध सुटतो.
पहिल्या पावसाच्या सरी अंगावर झेलायला मला खूप आवडते त्यात कागदाच्या होडी बनवून मुलासोबत त्या पाण्यात सोडण्याचा आनंदच वेगळा असतो.
प्रत्येक ऋतूंमधले वातावरण छानच असते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार झालेले असते. फुलं-झाडे बहरलेली असतात. गुलमोहोर जो आता कमी होत चाललाय लालचुटुक फुलांनी गच्च भरलेला असतो आणि त्याच दिवसात सणांची रेलचेल असते. मग दुर्वा, आघाडा, बेल पूजेसाठी गोळा करायचे. श्रावण महिन्यातल्या कहाण्या, स्तोत्रे, आरत्या आणि त्यासोबत दरवळणारा उदबत्ती आणि धुपाचा सुवास.
ऋतूनुसार भाज्या फळे बदलत जातात. मीठ लावलेली जांभळं, गरम भाजलेल्या भूईमूगाच्या शेंगा, मुगाची खिचडी आणि टमाट्याचे सार, पापड या दिवसात खायला मजा येते. सगळी धरणी थंड झालेली असते आणि त्याचबरोबर होणारा चिखलही नकोसा असतो.
आभाळ आलेले असताना कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाणे तेही गाडीवर. आजच्या धावपळीच्या युगात पावसाचा आनंद घ्यायलाही वेळ मिळत नाही. पण त्यातूनही शक्यतो वेळ काढावाच. कामामुळे आलेला थकवा दूर होतो. पाऊस पडत असताना छान गाणी ऐकत गरमागरम कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेणे, वाह! छानच.
"ग्रीष्म संपला वसंत सुरु झाला, थंडगार वारा पुन्हा अंगाशी झोंबू लागला,
ढगांचा गडगडाट , विजेचा कडकडाट, मराठी मातीचा सुगंध पुन्हा दरवळला,
बेभान वारा येणाऱ्या त्या धारा, या क्षणांचा आहे रंगच न्यारा". (unknown)