दिवाळी आली कि थंडीची चाहूल लागते. पहाटे उठून कार्तिक स्नान करायचे. अंगणात सडा रांगोळी करायचे,त्यात शेणाने सारवलेले असेल तर मग खूपच छान.
कुठेतरी चुलीवर पाणी तापत असताना त्या लाकडांचा किंवा शेणाच्या गौऱ्यांचा वास, कोंबड्याचे आरवणे,गायींच्या गळ्यातल्या घंट्यांचा आवाज,मंदिरात चाललेल्या काकडा आरतीचा आवाज ऐकू येतो. मग स्नान करून देवपूजा आणि देवाला आवळ्याची वात लावलेला दिवा.
या दिवसात खायची पण चंगळ असते, गरम गरम भाकरी त्यावर साजूक तूप नाहीतर लोण्याचा गोळा, वांग्याचे भरीत सोबत मेथीचा खुडा,ठेचा, भुरकी, कांदा, पेरू, आवळे, बोरं,हरियाल बूट, मटारच्या शेंगा आणि हुरडा. शेतात जाऊन हुरडा खाण्याची मजाच वेगळी असते आणि या दिवसात भूक वाढलेलीच असते. डिंकाचे-उडदाचे-मेथ्याचे लाडू खायचे.
निसर्गाच्या सानिध्यात वेळ देता यावा म्हणून आवळी भोजन याच दिवसात असते.आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणे म्हणजे आवळीभोजन. चहाचे कॉफीचे घोट घेत घेत सुरेल गाणी ऐकत बसायचे तेही सकाळच्या कोवळ्या उन्हात.
आणि यासोबत असते ती गुलाबी कुडकुडणारी थंडी. मस्त शेकोटी करून शेकत बसायचे.






No comments:
Post a Comment