Sunday, June 22, 2014

पक्षी भाग-१

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जति….

                              ह्या अशाच चांगल्या आठवणी घेऊन आम्ही नव्या घरात जाणार होतो. मला आणि आईला चिमण्यांची भारी हौस.जिथे राहायला जाऊ तिथे ह्यांचा शोध घेत असु,म्हणजे ते येतील अशा ठिकाणी दाणे, पोळी, तांदूळ, मुरमुरे, पाणी असं काहीतरी ठेवतो. असच ह्या घरात आल्यावर आम्ही केलं. पहिले काही दिवस इकडे पक्षी खूप कमी यायचे. नंतर नंतर जेव्हा आम्ही झाडांना पाणी घातलं. ती हिरवीगार झाली, फुलं आली तेव्हा चिमण्यांचे आगमन सुरु झाले.    


                                            आता तर हळूहळू खाऱ्या चिमण्या, खारुताई, पारवे, साळुंक्या, बुलबुल पक्षी आणि इतर चिमण्या येऊ लागल्या. खरंच पक्ष्यांची शाळा भरल्यासारखे वाटले ना! दिवसभर त्यांचा किलबिलाट चालू असायचा. त्यांच्यामुळे सकाळ व संध्याकाळची वेळ खूप रम्य वाटते.मग सुट्टीच्या दिवशी त्यांना बघत बसायचे मी. पोळीसाठी तर त्यांची भांडणं सुध्दा व्हायची.४-५ बोळके आणि एक वाटी भरून त्यांना पाणी ठेवलेले असायचे. एक चिमणी तर त्या वाटीत बसून आंघोळच करायची आणि नंतर मस्तपैकी पंख फडफडवायची. संध्याकाळी आम्ही झाडांवर पाणी मारत असू म्हणजे पानं जर टवटवीत दिसायची. एक काळी चिमणी रोज ब्रम्हकमळच्या पानांवर अक्षरशः लोळायची.तिला खूप छान गार वाटायचे. आतातर त्यांना आमचा सराव झाला होता. त्या अगदी आमच्या अवतीभवती फिरायच्या.

                   कित्येकदा वाटायचे कि हे कॅमेऱ्यात साठवून ठेवावे पण जेव्हा घेऊन बसायचे तेव्हा ह्या गायब! एकदा असंच कॅमेरा घेऊन बसले, पाणी पीत असलेल्या चिमणीचा फोटो काढायला पण तितक्यात ती
उडाली पण एक खारुताई येउन बसली, चला खारुताई तर आली फोटोत. एखादे दिवशी थोडा उशीर झाला ना पोळी टाकायला कि लगेच ह्यांचा चिवचिवाट जोरात सुरु व्हायचा,जणू काही हाकाच मारत आहेत.  
      
                                      आतातर हे घर सोडून दुसऱ्या जागी जायचे होते, काही दिवसांनी इथे दाणे टाकायला कोणी नसेल. त्यांनाही आठवण येईल आमची नाही का? एखाद्याला जीव, लळा लावायला किती वेळ लागतो आणि सोडून जायला काहीच नाही.

                             सध्या प्रदूषणामुळे, मोबाईलमुळे पक्षी खूप कमी होत आहेत. निदान आपण थोडे दाणे पाणी देऊ जेणेकरून ह्यांचं अस्तित्व टिकून राहील.

                       आता पुन्हा नव्याने नव्या जागी चिमण्यांशी मैत्री करावी लागेल कारण 
त्यांच्याशिवाय आम्हाला करमेल कसे बरे! 

No comments:

Post a Comment